
◆ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत
मुंबई : महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे.
दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु आहे.
काय आहेत पर्याय
पर्याय १
विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचं
पर्याय २
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचं हा दुसरा पर्याय आहे
या दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करतं आहे. तसंच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.