

जगभरात शांतीचा संदेश पोहचविण्याच्या उद्देशाने सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशने शनिवारी सकाळी १० वाजता १,३८१ विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून जागतिक विश्वविक्रम केला. या संस्थेचा हा महिनाभरातील दुसरा विश्वविक्रम आहे.
जगभरात वाढत चाललेली अस्थिरता, युद्धाची भीती आणि निरपराध लोकांचे होत असलेले हाल पाहता, ‘युद्ध नव्हे, शांती हवी’ हा मानवतेचा आवाज अधिक बुलंद करण्याची आज गरज आहे, असा संदेश या मानवी साखळीतून देण्यात आला.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या अनुषंगाने जगातील सर्वांत मोठे ‘जागतिक शांतता चिन्ह’ मानवी प्रतिक साकारून विश्वशांतीचा संदेश दिला गेला. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, हा संपूर्ण कार्यक्रम ‘गिनीज बुक’च्या माध्यमातून १८० देशांमध्ये प्रक्षेपित केला गेला. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांच्या पुढाकाराने झाला.
