फडणवीसांनी घेतली गुप्त बैठक पंकजा मुंडे- एकनाथ खडसेंविरुद्ध नवा डाव?

पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
विधानपरिषद निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केला. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांची एक गुप्त बैठक घेतली. यात या दोन्ही दिग्गजांच्या भूमिकेविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता फडणवीस पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध नवा डाव तर टाकत नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
फडणवीस औरंगाबाद मार्गे नागपूरला जात होते. त्यांनी औरंगाबाद येथील वाळूज जवळ एका पेट्रोलपंपावर पक्षाच्या ज्येष्ठ आणि राज्यस्तरावरील नेत्यांची तातडीची बैठक घेतली.दुसरीकडे भाजपचा मराठवाड्यातील चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांनी उमेदवारी न मिळाल्याने सोशल मीडियातून आपल्या भावनांना वाट करून दिली. त्या नाराज असल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला औरंगाबाद शहरातील राज्य पातळीवरील नेते उपस्थित होते.

आखली रणनीती
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्या दृष्टीने फडणवीस यांच्या उपस्थितीत रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे.

औरंगाबादेतच बैठक का?
भाजपची मातृसंस्था असलेला आरएसएस मराठवाड्याला देवगिरी प्रांत संबोधतो. आरएसएसच्या या देवगिरी प्रांतात मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसह जळगाव, धुळे आणि नंदूरबार या खानदेशातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. खानदेशात एकनाथ खडसे यांचे वजन आहे तर मराठवाड्यात पंकजा मुंडे यांचे. सध्या हे दोन्ही नेते पक्षावर नाराज आहेत. त्यांच्या नाराजीच फटका पक्षाला बसू शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने देवगिरी प्रांताची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये बैठक घेतली. यात या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

खडसे-पाटलांत जुंपली
विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. या बैठकीपूर्वी खडसे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी मिळते. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले होते. शिवाय पाठीत खंजीर खुपसल्याची टीकाही खडसे यांनी केली होती. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना गाय-बकरीची गोष्टीचे एक उदाहरण दिले होते. त्यामुळे खडसे यांची पक्षात होत असलेली घुसमट पुन्हा एकदा समोर आली. यावरही याबैठकीत चर्चा झाली.

Previous post 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यासंदर्भात ठाकरे सरकारचे एकमत
Next post टाळेबंदीतही रस्ते अपघातात 300 मृत्यू अनेक जन मिळेल त्या वाहनाने आपला प्रांत गाठण्याच्या प्रयत्नात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News